Saturday, December 3, 2016

म्युझियम डेज..

एक संदर्भ शोधण्याकरता मी नोटबुक्स, डाय-यांची उलथापालथ करत होते त्यावेळी मला २०१२ मधलं आर्ट जर्नल मिळालं. २०१२ च्या जुलैमधे मी डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियममधे त्याच वर्षी सुरु झालेल्या "मॉडर्न ऎन्ड कंटेम्पररी इंडियन आर्ट हिस्टरी" या पोस्ट ग्रॅड कोर्सकरता प्रवेश घेतला होता. कोर्स शुक्रवार-शनिवार-रविवार असे तीन दिवस असायचा.  शुक्रवार-शनिवार लेक्चर्स, त्यात शुक्रवारी इन-हाऊस फ़ॅकल्टी आणि शनिवारी एक्स्टर्नल फ़ॅकल्टी, आणि रविवारी आर्ट गॅलरी व्हिजिट्स, शोज- एक्झिबिशन्स वगैरे. 
हा कोर्स करत असताना मी एका आर्ट मॅगझिनचं काम करत होते, शिवाय एका दैनिकाकरता आर्ट कॉलम लिहायचे. बाकी इतर लेखन, फ़्रीलान्स असाइन्मेन्ट्स वगैरे असायच्याच. त्यामुळे सुरुवातीला प्रवेश घेतल्यावर सहज होऊन जाईल असं वाटलेला हा कोर्स वेळेच्या दृष्टीने फ़ारच हेक्टीक ठरला. घरी मुलींचं शाळा-कॉलेज, नव-याचे परदेश दौरे हे सगळंही त्यातच. अक्षरश: जीवतोड धावपळ झाली ती दीड वर्षं. पण कोर्स अत्यंत  इंटरेस्टींग होता यात वादच नाही. एकही लेक्चर बुडवू नये असं वाटायचं. तस्निम मेहतानी कोर्स डिझाईन करताना खूप विचार केला होता. मुंबईत अशा त-हेचा हा पहिलाच कोर्स होत होता त्यामुळे त्या दृष्टीनेही महत्व होतं. प्रोफ़ेशनल पद्धतीने, ब्रिटिश म्युझियममधे असलेल्या अशाच त-हेच्या कोर्सच्या अभ्यासक्रमावर बेतलेला होता. कोर्सची फ़ी ५० हजार, म्हणजे तशी तगडीच होती. बडोदा, जेएनयू, शांतीनिकेतन, बंगलोर, लंडन, अमेरिका सगळीकडून फ़ॅकल्टीज बोलावलेल्या होत्या. 
म्युझियममधला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरला. या आधी कधीही इतक्या जवळून म्युझियम अनुभवलं नव्हतं. 
तर आता अचानक हातात आलेलं आर्ट जर्नल चाळत असताना त्या कोर्समधलं प्रत्येक लेक्चर आठवायला लागलं. 
कोर्स पूर्ण झाल्यावर त्याचा नेमका काय फ़ायदा झाला वगैरे सांगता यायचं नाही, कारण एकतर मला नव्याने कोणतीही करिअर सुरु करायची नव्हती. माझी कलाविषयक जाण एकंदरीत वाढावी इतकाच उद्देश हा कोर्स करण्यामागे होता. माझी ’चित्रभाषा’ सुधारायला याचा फ़ायदा निश्चित झाला असं आता म्हणता येतय.
तर आता जमेल तसे आर्ट जर्नलमधे नोंदवलेले म्युझियम डेज या ब्लॉगवर क्रॉनिकल करावे असा विचार करते आहे. जरा मजा..

Thursday, November 3, 2016

लख्ख

एखादा क्षण लख्ख दिसतो. त्याच्या आजूबाजूच्या सामान्य क्षणांच्या गर्दीतून तो उठून दिसतो, झळाळतो. नेमकं काय करायला हवं, काय नको याची जाणीव तो क्षण करुन देतो.  लखलखत्या माणकासारखा हा क्षण घट्ट जवळ पकडून ठेवायचा. पुढच्या ब-याच वर्षांची बेगमी करुन देणारा हा क्षण.

Thursday, October 20, 2016

दीड दिवस आणि पाऊण रात्र घालवूनही हातातलं काम संपलं नाही, शिवाय त्यात आणखी कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागले, सकाळी तर ते अजूनच वाढायचं चिन्ह दिसलं, स्ट्रेस आला तेव्हा सरळ उठले आणि लॅपटॉप घेऊन बाहेर पडले, अजून दोघी मैत्रीणी ज्या त्यांच्याही कामाच्या प्रेशरखाली वैतागल्या आहेत त्यांना जॉइन झाले. मग आम्ही तिघी मिळून जवळच्या मॉलमधे लंच केलं आणि मग एकत्र बसून आपापली कामं केली. सोबत गप्पा आणि चहा आणि गाणी. तिघींच्याही डोक्यावरचं कामाचं प्रेशर झटकन निघून गेलं.
फ़्रीलान्सिंग करताना कामाचं, स्वत:च्या वेळेचं कितीही प्रिय स्वातंत्र्य असलं तरी ऑफ़िसमधल्या कम्युनिटी शेअरिंगच्या फ़ायद्यांना पर्याय नाही हे लक्षात आलं.

Monday, October 17, 2016

मी एक स्वार्थी वाचक

वाचन आणि पुस्तके संदर्भातल्या एका ग्रूपवर  Why do you read? या प्रश्नाला वाचकांनी I can not leave without books पासून I' d go insane if i didn't पर्यंत उत्तरे दिलेली वाचली. आणि आपण वाचन या प्रक्रियेत माझ्यापुरते बरेच इव्हॉल्व झाल्याचं जाणवलं. कोणे एके काळी मी सुद्धा अशीच निरागस उत्तरे दिली असावीत. एकतर पुस्तक वाचनाशिवाय मी आरामात दिवसेंदिवस जगू शकते हे अनुभवाअंती लक्षात आलय. 
दुसरं त्यातून निर्भेळ आनंद, करमणूक मिळवण्याची माझी कपॅसिटीच काहीशी कमी झाल्याने जोवर वेगळं काहीतरी मिळत नाही तोवर मी हातातलं पुस्तक वाचतच नाही हे लक्षात आलय. त्यामुळे माझ्यापुरती वाचन ही एक अत्यंत स्वार्थी गोष्ट झालीय. आता हे ’वेगळं काहीतरी’ मिळण्याचा स्वार्थीपणा कोणता? तर ते म्हणजे जोवर ’मला आवडलं असतं अशा प्रकारचं लिहायला’ अशी प्रतिक्रिया माझ्या मनात सुरुवातीच्या काही पानांतच किंवा त्याही आधी ब्लर्ब वाचूनच  उमटत नाही किंवा ’माझ्या लिहिण्याच्या जतकुळीला मिळतं जुळतं’ असं वाटत नाही तोवर मी पुस्तकाची पानही उलटायच्या भानगडीत पडत नाही. थोडक्यात  माझ्या स्वत:च्या लेखनाला वाचनातून काहीतरी प्रेरणा मिळणं, ट्रीगर मिळणं, मला लिहावसं वाटायला लागणं मस्ट आहे. 

Tuesday, October 11, 2016

तीन महिन्यांच्या गॅपनंतर आज टाऊनला चक्कर झाली.
कमलनयन बजाज गॅलरी मधे शुभांगी चेतन या आर्टिस्टचे ’पोत’ (टेक्श्चर्स) नावाचे प्रदर्शन भरले आहे. पहिलेच आहे. ब्लॅक इन्क, थोडी ब्राऊन टीन्ट वापरुन झाडांच्या खोडाचा पोत तिने आपल्या सगळ्या पेंटींग्जमधे रंगवला होता. दिसायला चांगली होती, चित्रांना फ़्लो छान होता पण ’पोत’ मधे जे वैविध्य अपेक्षीत आहे ते नव्हते. वैयक्तिकरित्या मला झाडांच्या खोडांचे फ़ॅसिनेशन असले तरी खरखरीत, खडबडीत, मुलायम, रखरखीत, रेशमी, मऊ, दगडी अशा अनेक प्रकारचे "पोत" असू शकतात ते इथे नव्हते. अर्थात हा आर्टिस्टचा चॉईस झाला. पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे एकाही इमेजला ’स्पर्श’ करुन पहावासा वाटण्याजोगे टेक्स्चर कॅनव्हासला आणण्यात आर्टिस्ट कमी पडली. वेगळे टेक्निक वापरुन हे करता आले असते. पेंटींग्जमधे रंगलेपनातूनही जो पोत दिसतो, ्जाणवतो तो इथे नव्हता. हे फ़्लॅट होतं.
ठाणे स्कूल ऑफ़ आर्टची विद्यार्थिनी
रचना संसदचे सर आपल्या फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना घेऊन आले होते, छान वाटलं तो घोळका पाहून. फ़क्त ते प्रत्येक चित्र मुलांना ’समजावून’ सांगत होते. त्या ऐवजी आधी त्यांना चित्र पाहू देऊन तुम्हाला काय ’समजले’ विचारले असते तरी चाललं असतं असं वाटलं.

एनजिएमए मधे अल्काझी फ़ाउंडेशनचं आर्काइव खुलं केलं गेलं आहे आणि ते महान अनमोल आहे. प्रत्येक नाट्यप्रेमीनीच नाही, तर चित्रकला, सिनेमा, राजकारण, प्रवास, संगीत, नृत्य यात रस असणा-या प्रत्येकाने ते पहावं. अल्काझी हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा. सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायची, नासिर, अमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले.

इंडियन कॉस्च्यूम्सची पुस्तकं, अल्काझींच्या नाटकांच्या सेट्सच्या मिनिएचए प्रतिकृती, त्यांचे कॉस्च्यूम्स, मराठी नाटकांच्या ऐतिहासिक संदर्भांचं पुस्तक, अल्काझींच्या थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडो, हजारो कृष्णधवल देखणी छायाचित्रे.

अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार, आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र अल्काझी चालवत होते. गेल्या शतकापासूनच्या नाट्य, चित्रकला क्षेत्रापासून राजकारणापर्यंत असंख्य बातम्यांचं कोलाज भिंतींवर लावलेलं आहे. त्यात धुरंधरांचं निधन पासून पाकिस्तानचा हल्ला, केनेडीची हत्या पासून गांधीचं उपोषण.. अनेक बातम्या खरोखरीच्या वाचायला मिळतात.
सुलतान अकबर म्हणजे अकबर पदमसींचे कोण?
अल्काझी किती छान चित्रकारही होते. अनमोल डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.

हे प्रदर्शन पुन्हा पाहून त्यावर सविस्तर लिहायला हवं आहे.

बाकी तीन महिन्यांनंतर गेले आज टाऊनला. तो एक अनुभवच वाटला वेगळा. मरिन ड्राइव, त्यावरचा मावळता सूर्य, नरिमन पॉइन्ट, वरळी, हाजी अलीची स्कायलाईन पाहून नजरेवर गेले कित्येक दिवस ठळकपणे उमटलेली आल्बनी, न्यूयॉर्कच्या देखण्या नजा-यांची इम्प्रेशन्स फ़िकट झाली. आपली मुंबईही किती देखणी आहे.. असं झालं.


जादू

ही रात्र, हे चांदणं पुन्हा नसेल, ही जादू नसेल..
झाडांवरुन निथळणा-या सावल्या
बहार निघून जात आहे
पुन्हा परतून येणारे नाहीयेत हे काफ़िले बहारके, एकदाच पुकारतील तुला ते जायच्या आधी आणि मग कायमचे दिसेनासे होतील..
ही जादू अनुभवण्याचा हा एकच क्षण.. तो चिरकाल नाहीच

देव आनंद गातो आहे आर्तपणे, कदाचित स्वत:करताच. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जुवेल.


जे हवं ते मिळण्याचा आणि त्यातली जादू हरवून जाण्याचा क्षण हा अनेकदा एकच असतो..
ही नात्यातली मर्यादा.

तुम्हाला खूप लिहायचं असतं, वाचायचं असतं, इकडे तिकडे हिंडून काही काही बघायचं असतं पण एकच एक कोणततरी रटाळ पण अतिआवश्यक काम तुमचे पाय, हात, डोकं सगळं बांधून ठेवतं. ते पूर्णही होत नाही, अर्धवटही सोडता येत नाही. मग तुम्ही अतिआवश्यक काम तसंच ठेवून अत्यंत फ़ुटकळ टाईमपास स्क्रीनवर करत रहाता. अतिआवश्यक काम अशाने अजून अजून अजून लांबत चालले आहे हे लक्षात येतच एका क्षणी. त्यानंतर मग निव्वळ हताशा आणि कीबोर्डवर थडाथड राग काढत रहाणं.. इतकंच हातात रहातं.

पुन्हा आलमेलकर

आलमेलकरांचं काम मी आधी खूप पाहिलेलं नाही, एमजिएमएचं प्रदर्शन पहाताना पण समहाऊ हे आपण सारखं सारखं अनेकदा पाहिलय असं वाटत राहिलं. कदाचित त्यांचे गुरु बेन्द्रे, त्यांची चित्रं मला खूपच आवडतात. ती अनेकदा पाहिलेली आहेत. आणि आलमेलकरांच्या पठडीतले दलाल आणि इतर बरेच आहेत. शिवाय आलमेलकर ज्या आदिवासी चित्रांकरता सर्वात जास्त फ़ेमस आहेत ती किंवा तशी इतक्यांदा कॅलेंडर्सवर, दिवाळी अंकांवर, इलस्ट्रेशन्समधे, घरांच्या भिंतीवर सजावटीकरता लावलेल्या फ़्रेम्सवर पाहिली आहेत त्यामुळे हा देजावू.
रेषा डौलदार आहे, पण त्यात स्वैर रेषेतली मजा मिसिंग वाटते. रंग जरा जास्तच झळझळीत त्यामुळे कृत्रिमतेकडे, डेकोरिटवपणाकडे झुकणारे वाटले कॅनव्हास. आदिवासी स्त्रियांच्या कपड्या, दागिन्यांमधेही वास्तवता मिसिंग आहे. सगळ्या एकजात दागिन्यांनी नटलेल्या. बर तेही दगडांचे किंवा नैसर्गिक बिया, मण्यांचे दागिने नाहीत, चक्क पुतळ्यांच्या माळांसारखे हार गळ्यात. जरा जास्तच सधन आदिवासी वाटत होते. रोमॅन्टीक, काव्यमय आदिवासी जीवन. स्टायलेझशनचा प्रभाव. बेन्द्रेंवरही होताच तो प्रभाव.
देवदत्तची चित्रं मला खूप आवडतात, पण त्याच्या चित्रांवर असलेला युरोपियन प्रभाव- हे आपलं पॅलेट नाही. स्किन कलर वगैरे..हे युरोपियन पण तिथे शिकल्यामुळे त्याच्यावर तो प्रभाव उमटला. त्यातून तो बाहेर पडत नाहिये.

साच्यामधे का अडकतात आर्टिस्ट? उदा. शशिकांत धोत्रे.
खरं तर त्याची दगडफ़ोडणार्यांची पार्श्वभूमी. मग त्याला का वाटू नये त्यांचं जगणं कॅनव्हासवर उतरवावं असं?
जसं पोटॅटो इटर्सचं जगणं व्हॅन गॉघला उतरवणं महत्वाचं वाटलं तसं?
कोळशाच्या खाणीतलं वातावरण आपल्या इन्स्टॉलेशन्समधून मांडणं प्रभाकर पाचपुतेला महत्वाचं वाटलं तसं?

डिझाईनमधला, आर्टमधला, व्यक्तिमत्वातला साधेपणा दुर्लक्षिला जातो. त्यात आकर्षून घेणारे कोणतेच एलेमेंनट्स नसतात. साधेपणा म्हणजे बेंगरुळपणा, आळशीपणा, शॉर्टकट असाही समज होतो. 
कंगोरे, नक्षी, रंगाची उधळण, वैविध्य हे डिझाईनला गुढपणा आणतात, खोली आणतात. 
निदान तसा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतात. 

निळं, स्वच्छ, एकरंगी आभाळ नजरेला कंटाळा आणतं. पण रोज सकाळ संध्याकाळ रंगांची उधळण करणारं आकाश कितीही वेळा पाहून मन भरत नाही. 

असं असताना साधेपणाची ओढ का वाटावी मनाला? 

मिनीमालिझममधलं सौंदर्य ज्याला उमगलं त्याला सगळं उमगलं. जगणं उमगलं. 
खरंखुरं जगताना सोबत कशाचीही गरज वाटू नये. 
सोबत असावी फ़क्त आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाची. ज्यात काहीही अडगळ शिल्लक नाही, कोपरे लख्ख आहेत, त्यात राहणं हे खरं जगणं.

Monday, October 10, 2016

कलेमधे काही जेनेरिक आर्ट फ़ॉर्म्स असतात. उदा. नाग मंडल किंवा ट्री ऑफ़ लाईफ़, किंवा इतरही अनेक. आदिवासी कला या मोटिफ़्सना बेस धरुन विकसित होते.
आजकाल अनेक शहरी कलाकार- पेंटर्स किंवा दागिने बनवणारे, आपल्या कलाकृतींमधे हे मोटिफ़्स वापरतात. जसेच्या तसे. काही मोजके कलाकार या मोटिफ़्सना स्वत:च्या वेगळ्या कल्पकतेने वेगळ्या स्वरुपात खुलवतात.  उदा. के. जि. सुब्रमण्यन, गणेश पाईन. ते मुळच्या आदिवासी मोटिफ़्समधे आपल्या काही वेगळ्या मटेरियल, फ़ॉर्म, कन्सेप्टमुळे वेगळेपणा आणतात.
पण इतर अनेक जण असतात ते आदिवासी मोटिफ़्स जशीच्या तशी कॉपी करतात.
आणि म्हणतात हा तर जेनेरिक फ़ॉर्म आहे.

एक आर्ट हिस्टोरियन या नात्याने यात माझा काय टेक असू शकतो?

मुळात आदिवासींनी निसर्गातून हे मोटिफ़्स उचलले आणि आपल्या कलेत आणले तेव्हा त्यात स्वत:चा डिझाईन सेन्स, बुद्धी, कल्पकता ओतली. त्यातूनच हे मोटीफ़ तयार झाले. हे जेनेरिक मोटीफ़ प्रत्येक जमातीतल्या आदिवासींचे वेगळे, त्यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेले आहेत. त्यात त्यांनी आपली स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण कला ओतली आहे, त्यांच्या स्वत:च्या शैलीत ते मोटीफ़ विकसित झाले आहेत.
उदा. ट्री ऑफ़ लाईफ़ मोटीफ़. प्रत्येक आदिवासी जमातींमधला ट्री ऑफ़ लाईफ़ वेगळा आहे. त्या जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्सनी तो स्पष्ट वेगळा ओळखता येतो.
उदा. हा गोंड जीवनवृक्ष, हा सावोरी जीवनवृक्ष, हा वारली जीवनवृक्ष, हा मधुबनी.. इत्यादी.

एका जेनेरिक मोटीफ़पासून या प्रत्येकानी स्फ़ुर्ती घेऊन आपला स्वतंत्र जीवनवृक्ष विकसित केला. 

पण शहरी कलाकार काय करतात? ते हाच मोटीफ़ आपल्या कलाकृतींमधे उदा. पेंटींग, दागिन्यांमधे वापरताना जसाच्या तसा वापरतात. स्वत:ची काहीही वेगळी वैशिष्ट्य त्या डीझाइनमधे घालण्याचे कष्ट घेत नाहीत, स्वत:ची वेगळी कन्सेप्ट विकसित करत नाहीत.
सगळी नैतिकता धाब्यावर बसवून ते हे करतात. आणि म्हणतात सगळेच करतात.

सगळेच तसं करतात, म्हणून मीही.
या विधानांना काय अर्थ असतो नेमका? 

आणि मग तुमच्या ग्राहकांचं काय? ते  तुम्हाला डिझाईनच्या एक्स्क्लुजिविटीचे पैसे देतात, भरमसाठ.
त्यांची फ़सवणूक नाही का या प्रकारात? फ़ार तर स्किलचे पैसे लावा. डिझाईन, फ़ॉर्म किंवा कन्सेप्टचे कसे लावता?
शिवाय मग तुम्हाला आर्टिस्ट का म्हणायचे? 



निसर्गातल्या नैसर्गिक ध्वनींमधून लोकसंगीत बनतं.  लोकसंगिताच्या त्या धूनपासून एखादा कल्पक संगीतकार, काही संस्कार करुन गाणं बनवतो. ते योग्यच असतं. पण मग त्या गाण्यावरुन बाकी संगीतकार आपापल्या भाषेत जशीच्या तशी गाणी बनवतात. ते चूक असतं.
पण कोणी आक्षेप घेतला तर ते म्हणतात हे मुळातलं लोकसंगीत. अरे पण मग त्या संगितकाराने आपला वेगळा ठसा उमटवून धून बनवली तसं तुम्ही करायचे कष्ट का घेतले नाहीत?

जेनेरिक मोटीफ़्सच्या बाबतीत आर्टिस्टने स्वत:ची काहीतरी वेगळी कल्पकता, कन्सेप्ट वापरायलाच हवी.
पिरियड

Wednesday, May 11, 2016

उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस...

जॉगर्सपार्कच्या बाहेरच्या गुलमोहोराची लाल फ़ूले लगडलेली एक फ़ांदी सप्पाकन कापून रस्त्याच्या मधोमध टाकून दिलेली. अशक्य शहारा येतो अंगावर. पाऊस येईल आता लवकरच तेव्हा त्याच्या तयारीची ही मुन्सिपाल्टीची लगबग.
ब-यापैकी तरुण ्वयातला एक्स बॉस हार्ट अ‍ॅटेकने दोन दिवसांपूर्वी गेला ही बातमी मनात नेमकी तेव्हाच घोळत असते,
मुंबईत घामाच्या धारा लागलेल्या असताना कुठे कुठे, पुणे, नाशीक वगैरे ठिकाणी पावसाच्या सरीने वातावरण धुंदफ़ुंद झाल्याची फ़ेसबुक स्टेटसे चीड आणतात.
कोंदलेल्या हवेत धड कामही झालेलं नसतं दिवसभर.
उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस नकोसे वाटतात. आंब्यांची क्रेझ ओसरलेली, लाल-पिवळ्या-जांभळ्या-निळ्या-गुलाबी फ़ुलांचे बहर डोळ्यांना सुखावून थकलेले असतात. आणि उकाडा ऐन भरात.
सरता उन्हाळा..

Sunday, May 1, 2016

उन्हाळी दुपार

लखलखत्या उन्हामधे खिडकीबाहेर पहाताना तंद्री लागते. हिरव्या पोपटी लहानशा पानांच्या ढिगावर सोनेरी पिवळी बुंदक्यांसारखी सजलेली पेल्टोफ़ोरमची फ़ुले वा-याच्या झुळकीत इकडुन तिकडे डोलतात आणि मग टपटपत खाली उड्या मारतात. बिल्डिंगच्या आवारात पिवळ्या फ़ुलांच्या गालीच्याची गच्चदाट पखरण होते दिवसभर. पार्क केलेल्या गाड्यांच्या टपावरही पिवळे बुंदके चिकटवल्यासारखे. हे यलो पेल्टोफ़ोरम इन्स्टॉलेशन चैत्राचं. मांडीवरचा लॅपटॉप स्तब्ध होतो, काय लिहायचं ते कधीच मनातून गळून पडलय. जरा कान दिला तर पेल्टोफ़ोरमचं फ़ुल गाडीच्या टपावर पडतानाचा अलगद आवाजही ऐकू येईल याची खात्री वाटावी इतकी निरव स्तब्धता.
उन्हाळाच्या अशा  दुपारच्या वेळा खतरनाक.
रविवारी संजय गांधी नॅशनल पार्कमधे प्रेस्ड फ़्लॉवर वर्कशॉपला गेले होते. बॉटनीची स्टुंडन्ट असल्याने मला हर्बेरियम्स कशी करायची माहित आहे. शिकत असताना बोटॅनिकल एक्सकर्शन्सना गेल्यावर वेगवेगळी फ़ुलं, पानं प्रेस करुन सुकवायचं टेक्निकही माहित झालेलं. नंतर बॉटनीशी संबंध सुटला पण कशी माहित नाही, फ़ुलं सुकवायची सवय कायम राहिली. मधून मधून बुकमार्क, ग्रिटींग करुन मित्र-मैत्रिणींना देण्याकरता त्यांचा उपयोग व्हायचा. पण हा उत्साह फ़ार कमी वेळा येतो. या वर्कशॉपमधे सुकवलेल्या फ़ुलांचं आणखी काही वेगळं, सोपं करायला शिकवतील असं वाटलेलं. तर ते तसं काही फ़ार वेगळं मिळालं नाही शिकायला पण त्या निमित्ताने इतक्या सकाळी (साडेसात वाजता) बोरिवलीच्या जंगलात जायचा अनुभव खूप वर्षांनंतर घेतला. काही वर्षांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नेचर ट्रेल्सना खूप वेळा यायचे. लोकं मस्त दुर्बिणी वगैरे घेऊन बर्ड वॉचिंग करत होते, सायकली फ़िरवत होते, व्यायाम चालू होते, काहीजण भल्या पहाटेच जंगलात खोलवर फ़िरुन आता परतत होते. मस्त, उत्साही वातावरण. सगळ्यात सुंदर गुलमोहोर, पळस, काटेसावर, सोनमोहोर, बहावा, आसूपालवचे फ़ुलांनी लगडलेले वृक्ष. अहाहा..  हावरटासारखी पुन्हा खाली गळून पडलेली फ़ुलं, शेंगा, बिया गोळा करुन घेतल्यात. आता वर्कशॉपमधे शिकवलेल्या जरा वेगळ्या टेक्निकने पुन्हा काहीतरी करुन बघायला हवा. अंगात नवा उत्साह भरण्याची निसर्गाची शक्ती अफ़ाट आहे. 

Tuesday, April 26, 2016

लहान वयात दोनदा एव्हरेस्ट आणि गौरिशंकर चढून गेलेल्या संतोष यादव यांची एक अनौपचारिक मुलाखत वाचत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी माउंटेनिअरिंगमधून ब्रेक घेतला. आता त्या हिमालयात एका गावात लहान मुलांकरता शाळा भरवतात. अगदी साध्या सुध्या आहेत संतोषजी. कोपरापर्यंत ब्लाऊज, सुती साडी, तिचा डोक्यावरुन हरयाणवी पद्धतीने घेतलेला पदर, कपाळावर पिंजरेचं कुंकू वगैरे असं मुलाखतीत लिहिलेलं.
तर त्या सांगत होत्या की मुलांना पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवायचं असेल तर आधी निसर्गाशी, हिमालयाशी नातं जोडणं शिकवायला हवं. आणि त्याकरता त्यांना स्वत:शी, समाजाशी, नात्यांच्या परिघाशी पक्क बांधणं गरजेचं आहे. आता हे कसं करायचं याचा बराच विचार, प्रयोग केल्यावर  लक्षात आलं की त्याकरता त्यांना आपल्या संस्कृतिशी, धर्माशी जोडून ठेवायला हवं. त्यांच्या मनाला, शरिराला शिस्त शिकवायला हवी. आजच्या काळात, जिथे मोहाची, लक्ष विचलीत होण्याची साधनं मुलांच्या सतत अवती भवती असतात तिथे हे साधता येणं अत्यंत मुश्किल. पण जर धर्मातल्या, संस्कृतीतल्या काही रिच्युअल्स, उदा. पूजापाठ, ध्यानधारणा वगैरे.. त्यांच्या अंगात भिनवल्या गेल्या, तर आपोआप त्यांच्या दिनक्रमाला शिस्त लागते. मनाला शिस्त लागते. ध्यानधारणेमुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण वाढते आणि मग स्टॅमिना, उर्जा वाढते असे बरेच फ़ायदेही होतात. साधारण पारंपरिक हिंदू घरांमधे या रिच्युअल्स रेग्युलर पाळल्या जातात, पण शहरी मुलांना ते शिकवणार घरात कोणी नसतं. म्हणून मग कधीही उठा, कधीही, कसंही जेवा, कधीही झोपा असे प्रकार लहान वयापासून सुरु होतात आणि मग बेशिस्त अंगात भिनते, जी आपल्या आयुष्यातही उतरते.
आता यातलं योग्य-अयोग्य इत्यादीबद्दल वेगळी मतं असू शकतातच.

बाकी धार्मिकता वगैरे जाऊदे. पण मला रिच्युअल्सचं इन जनरल महत्व मात्र हल्ली मनापासुन पटायला लागलय. कर्मकांड शब्दातला धार्मिक संदर्भ बाजूला ठेवला तरी रोजच्या जगण्यात इतरही असतातच ती.
अशा रिच्युअल्स करण्यामुळे आयुष्य सोपं आणि आपल्या ताब्यातलं होतं. ठराविक गोष्टी ठराविक वेळेत उरकल्या एकदा की मग बाकी गोष्टी करायला दिवस मोकळा. गरजेच्या गोष्टीच झाल्या नाहीत असा ताण मग मनावर रहात नाही.
पूर्वी मी ट्रेक, पिकनिकवर गेल्यावरही सकाळी मेडिटेशन वगैरे करणं न चुकवणा-यांचा वैताग करायचे. पण आता आपापल्या दिनक्रमानुसार, गरजेनुसार काही रिच्युअल्स आपल्यात भिनवणं आत्यंतिक गरजेचं आहे हे मला कळलय. मग ते हेल्थ रुटीन असो, ब्यूटी रेजिम असो की वर्क शेड्यूल. रात्री झोपायच्या आधी उद्याच्या कामांची यादी करणे, सकाळी उठल्यावर योगासनं, ब्रिदिंग एक्सरसाईज करणे, वॉक घेणे, ठराविक वेळीच आंघोळ करणे, जेवणे पासून अगदी आठवड्यातून अमुक दिवशी केसांना तेल लावणे, पेडिक्युअर करणे अशी कामे रिच्युअल म्हणून अंगात भिनवून घेतली की निदान अशा कामांनाही (माझ्यासारखी) रिमाइंन्डर्स लावायची गरज रहात नाही.
मात्र रुटीनचं रिच्युअल होण्याकरता कठोर शिस्तीला पर्याय नाहीच. इथे ती मुळातच अंगात नसल्याने हे सगळं अधुन मधुन बारगळतं. अजून पूर्वीपासून सुरुवात करायला हवी होती, जरा आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं या बाबतीत तरी ऐकायला हवं होतं असं वाटत रहातं.
आणि आता यात अजून एक विदारक गंमत अशी की स्वत:त रिच्युअल्स भिनवायचं महत्व कळायलाच इतकं आयुष्य उलटलं, मुलींचं काय? त्यांना कसं हे रिच्युअल्सचं महत्व समजवायचं? ते शक्य नाहीच व्हायचं आमच्याने. आम्हीच मुळात रात्री दीड दोननंतर झोपणार, मग सकाळची कामं दुपारी करणार.. शेड्यूलच्या धज्जियां स्वहस्ते रोज उडवणार.. मुलींना स्वत:हून लवकर अक्कल येवो.
तर आता संतोष यादवजींच्या शाळेमधे या वयातही भरती होता येतय का याची चौकशी करावी असा विचार मनात येतोय.


एकेक आठवडा असा येतो की तो मध्यावर आलेला असताना लक्षात येतं सगळ्या ठरवलेल्या शेड्यूलच्या धज्जियां उडताहेत. एकही काम ठरवल्यानुसार होत नाहीये. रोजची कामंही मागे पडताहेत. अगदी रविवारचे पेपरही गुरुवारपर्यंत वाचून झालेले नसतात. ठरवलेल्यापैकी एकही कामाचा फोन झाला नाही, लिहून झालेलं नाही आणि आता ते अगदी गळ्याशी आलय. यामागे आपलीच चालढकल, भलत्याच गोष्टींमधे रमून जाणं, फ़ेसबुकवर रेंगाळणं, मित्रमैत्रीणीसोबतचा फ़ुकट टाईमपास, फोनवरची लांबलेली गॉसिप्स हे सगळं असल्याचं पक्कच ठाऊक असल्याने दोष कुणावर ढकलताही येत नसतो. 
सगळ्यात दारुण म्हणजे हे असे आठवडेच जास्त असतात याची जाणीव डायरीची मागची पानं उलटल्यावर लक्षात येणं. साधारण बुधवार-गुरवारच्या सगळ्याच एन्ट्र्या या अशा स्वत:ला कोसणा-या. 
कितीही टाईम मॅनेजमेन्टच्या टीप्स वाचा, डिक्लटरिंग, मिनिमलिझमचे कॉलम्स लिहा.. मनाला लगाम घालण्याची बाळबोध पुरातन शिकवण अंगी रुजत नाही तोवर सगळं व्यर्थ आहे. 

Monday, April 25, 2016

पॅटर्नच्या अलीकडे पलीकडे..

पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे तुम्हाला हलता येत नाही. म्हणजे तुमचं जगणं, वाचणं, बोलणं, व्यक्त होणं, लिहिणं अगदी वेगळं वागणंही पॅटर्नच्या आसपासच. पॅटर्न रक्तात गोंदवलेला असतो. डिएनएच्या पत्र्यावर ठोकलेला असतो.
आपल्या जन्माच्याही अगोदरपासून कित्येक जन्मलेल्यांनी त्यांच्या जगण्यातून ठरवलेला पॅटर्न.
पॅटर्नच्या जरा इकडे किंवा जरा तिकडे बरेच जण जातात. काही मोजके फ़ारच इकडे किंवा फ़ारच तिकडे सरकत जातात. दुस-या पॅटर्नच्या जगण्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या जवळ, कधी कधी थेट त्यांच्या परिघातच घुसून.
त्यातले काही नंतर व्यक्त होतात लिहिण्यातून, बोलण्यातून तेव्हा आपल्यापर्यंत त्यांचं असं खूप इकडे तिकडे सरकून वागलेलं, जगलेलं पोचतं.
अर्थात व्यक्त होताना, व्यक्त होण्याकरता त्यांना पुन्हा आपल्या आधीच्या पॅटर्नच्याच आसपास येऊन पोचावं लागतच, तरंच आपलं पॅटर्नपासून फ़टकलेलं जगणं पॅटर्नच्या परिघात जगणा-यांपर्यंत पोचवण्यात यश मिळतं. त्यांना याची का गरज वाटावी? म्हणजे त्यांना खास याकरता पुन्हा पॅटर्नच्या इतक्या जवळ यावसं वाटावं हे जरासं केविलवाणच. आधीचा सगळा प्रयास कशाकरता होता मग?
पण निदान त्यामुळे आपल्याला वेगळं जगलेलं, वागलेलं पहायला मिळतं.
काही मुळातच आपल्यापेक्षा वेगळ्या पॅटर्नमधे जगणारी असतात. ते त्यांच्या पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे न हलता जगतात. त्यांच्यापैकी काहीजण खूपच अलीकडे पलीकडे जाऊन आपल्या पॅटर्नच्या अगदी जवळ, अगदी आपल्या परिघातच येऊन जगायला लागतात. आपल्याला सुरुवातीला ते वेगळं वाटतं पण त्यांच्या परिघातून आपल्या परिघापर्यंत येईस्तोवर त्यांच्या वेगळ्या पॅटर्नचे कानेकंगोरे घासुन, ठोकून आपल्या पॅटर्नमधे फ़िट बसण्याजोगेच झालेले असतात. अगदी त्यांच्या अंगावरचे वेगळे ठिपके, डिझाईनही फ़िकट होऊन पुसलेले आणि इव्होल्यूशनच्या थियरीनुसार या बदललेल्या पॅटर्नच्या नव्या डिझाईनचा अंगरखा त्यांच्या अंगावर चढायला सुरुवातही.

पॅटर्नमधल्यांची अशी ये-जा सारखी चालूच असते. एका पॅटर्नवाल्यांना दुस-या पॅटर्नवाल्यांच्याअ ख-या जगण्या वागण्याची फ़ारशी जेन्युईन कल्पना येऊच नये या हेतूने सगळी रचना कशी पॅटर्नप्रूफ़.  

Sunday, April 24, 2016

मुंबई मोमेन्ट-एक

भर दुपारचं मुंबईतलं रणरणतं उन्ह. आजचा शनिवार बरेच दिवस राहून गेलेली टाऊनमधली काही महत्वाची आर्ट एक्झिबिशन्स बघण्याचा. चालतच जायचं हा अट्टहास भारी पडतोय का असं या कोसळत्या उन्हामधे पावलं उचलताना क्षणोक्षणी वाटतय. पण मजाही येतेय. 

एनजिएमएमधे सौंदर्यवादी, फ़िगरेटीव परंपरेतले आलमेलकर बघून झाल्यावर वरच्या डोममधे भरलेलं प्रभाकर पाचपुतेचं विदर्भातल्या कोळशांच्या खाणींमुळे बदललेल्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य असलेलं इन्स्टॉलेशन बघणं हा किती टोकाचा, वेगळा अनुभव. एक नॉस्टेल्जियाची सुनहरी सैर आणि दुसरी जळजळीत वर्तमान. आलमेलकरांची स्ट्रॉबोर्डवरची लयबद्ध आदिवासी जीवन चित्रित करणारी आल्हाददायक स्केचेस, कॅनव्हासवरची वॉटरकलर्स, टेम्पेरा..  त्यात त्यांच्या जगण्यातलं वास्तव फ़ारसं आलेलं नाही, आलं असलंच तर आकर्षक, निर्भर, काव्यमय जगण्याच्या टिपिकल साच्यातलंच. पाचपुतेने डोमच्या भिंतींवर कोळशाने चितारलेली स्वैर स्केचेस, मातीच्या जमिनीवरचे तडे, खाणींमुळे पडलेली विवरं, टोळधाडी, खाणकामगारांचं अधांतरी, असुरक्षित जगणं.. चित्रकला निदान इतका प्रवास करुन वास्तवापर्यंत पोचते आहे हे दिलासादायक वाटलं.
क्लार्क हाऊसमधलं सचिन बोंडेचं प्रदर्शन, तेलसाम्राज्याचा राजकीय, सांस्कृतिक आढावा हेही याच प्रकारातलं. 
केमोल्डमधे डेसमन्ड लाझारेस. मायग्रेशनची त्याची वैयक्तिक कहाणी..

आर्टीस्ट्सचं काम पाहून झाल्यावर नेहमी मनात येणारा सनातन प्रश्न. पोचलाय का हा माणूस पूर्णपणे आपल्यापर्यंत त्याच्या कलेसोबत? कशाला पोचायला हव खरं तर? कथेतून, कादंबरीतून लेखकातला माणूस कुठे पोचतो प्रत्येकवेळी? मग चित्रकाराच्या मनातल्या उर्मी, स्पंदनं कॅनव्हासवरुन पोचायला हवीत हा मनाचा आग्रह का आहे माझ्या? आर्ट एक्झिबिशन पाहून झाल्यावर आर्टिस्टशी बोलल्याशिवाय, त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. त्याचा प्रवास आणि माझ प्रवास हा एका कोणत्या तरी बिंदूला एकमेकांना छेदायला हवा. त्या क्षणीक नजरानजरीतून जे समजतं ते अलौकिक असतं हे मात्र खरं.

वेवर्ड अ‍ॅन्ड वाईजमधून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेफ़ डायरचं द सर्च घेतलय. त्याचं जेफ़ इन व्हेनिस आवडलेलं. बघू हे कसं आहे. या दुकानात आख्खा दिवस घालवायचा आहे एकदा. किंवा अनेकदा.


पुन्हा ब्लॉगिंगकडे..

आज संवेदने आठवण करुन दिली तेव्हा लक्षात आलं की कितीएक दिवसांमधे निरुद्देश, मनमोकळं, फ़क्त स्वत:करता असं लिहिलंच नाहीये. दिसामाजी लिहिणं होतंच असतं व्यवसायच लेखकाचा म्हटल्यावर. तरीही आत्यंतिक प्रेमातून लिहिणं फ़ारच वेगळं. लेखनातला मनमोकळा श्वास म्हणून तरी आता लिहायला पाहिजे असं.. रोजच्या जगण्यातलं, विस्कळीत, काहीही, बिनामहत्वाचं आणि स्वत:ला आवडलेलं.
कोणी वाचो, न वाचो..
आता याकरता नियमित वेळ काढणं आलं. जो मोकळा वेळ सध्या मिळतोय तो सगळ फ़ेसबुकवर फ़ालतू काहीतरी वाचण्यात जातोय.
खरय
फ़ेसबुकवरच्या फ़ुटकळ पोश्टींमुळे हे सगळं होतय.
च्यामारी त्या फ़ेसबुकच्या. सगळ्याची वाट लावलीय.. वेळेची, वाचनाची आणि लिहिण्याची.